पुणे : भारतातील आदिवासींच्या ६८० जमातींनी निर्मित केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’ प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मेळघाटचे कोरकू दाम्पत्य बाजीराव कासदेकर, रिमाय बाजीराव कासदेकर आणि पूर्वांचलच्या विद्यार्थिनी मायसिलीन, चिची, मंजू, अफेन, आचीन यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ‘ट्रायफेड’चे डेप्युटी मॅनेजर एक. के. पंड्या, ट्राइब इंडियाचे सीनिअर असिस्टंट ऑफिसर पवन सोरेन, ‘भारतीय आदिवासी जीवनशैली’ आणि ‘बालमुद्रा’ या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे, संतोष महाडिक उपस्थित होते. पर्वती पायथा चौक येथे २७ जुलैला हा कार्यक्रम झाला. यावेळी कोरकू दांपत्य कासदेकर यांनी बांबू कलाकुसरीची माहिती दिली. श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार मान्यताप्राप्त हे प्रदर्शन पुण्यात सुरू झाले आहे. या ठिकाणी वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन व विक्री व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रदर्शनात कपडे, किचनमधील वस्तू, कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू, शिल्पे, चित्रे, भेटवस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश आहे. देशाच्या विविध राज्यांतील आदिवासींकडून या वस्तू मागविल्या आहेत आणि उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान, कोरकू, माडिया, गोंड अशा आदिवासी जमातींचा समावेश आहे.
देशातील आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरू होणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. भावी काळात आदिवासी ज्ञानविषयक हे ‘नॉलेज सेंटर’ म्हणून विकसित करणार असून ‘ट्रायबल फूड’देखील उपलब्ध करून देणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.